
इसापुर व सातनाला धरणातून पाण्याचा विसर्ग; कोरपना तालुक्यात पूरस्थिती
इसापुर व सातनाला धरणातून पाण्याचा विसर्ग; कोरपना तालुक्यात पूरस्थिती
पैनगंगा व वर्धा नदीला पूर; अनेक मार्गांवर वाहतूक ठप्प
चंद्रपूर प्रतिनिधी – मनोज गोरे
कोरपना : यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्यातील इसापूर धरणाचे १३ पैकी ९ दरवाजे तसेच जैनत मंडलातील सातनाला धरणाचे ४ पैकी ३ दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, चंद्रपूर तालुक्यासह यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्युसेक पाण्यामुळे पैनगंगा व वर्धा नदी दोन्ही काठोकाठ भरून वाहत असून, नदीलगतच्या गावात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. शेतशिवार, पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शनिवारी रात्री सुमारास वर्धा नदीवरील धानोरा–भोयगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. तर, पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोडशी बूज–कोरपना, कोडशी बूज–कोडशी खू, गांधीनगर–तेजापूर, जेवरा–गाडेघाट, पिपरी–मूर्ती, परसोडा–पीपरड, कोडशी बूज–देऊरवाडा आदी मार्ग बंद करण्यात आले आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून या मार्गांवर बॅरिकेट्स लावले आहेत.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पूरस्थितीचा धोका लक्षात घेता परसोडा, रायपूर, कोठोडा बूज, मेहंदी, पारडी, अकोला, भोईगुडा, जेवरा, तुळशी, गांधीनगर, कोडशी बूज, कोडशी खू, पिपरी, वनोजा, अंतरगाव, सांगोडा, कारवाई, विरुर, इरई, भारोसा, भोयगाव आदी गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पिकांचे मोठे नुकसान पुरामुळे शेतशिवार पाण्याखाली गेले असून कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पाणी पातळी सतत वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.